Gram Panchayat Wadali Najik

🌸 ग्रामपंचायत वडाळी नजिक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे 🌸

वडाळी नजिकचे लोकजीवन

अर्थकारण आणि रोजगार

वडाळी नजिकची खरी ओळख केवळ त्याच्या भौगोलिक आणि प्रशासकीय प्रगतीमध्ये नसून, येथील समृद्ध लोकजीवनात आहे. वडाळी नजिकचे ग्रामस्थ अत्यंत साधेपणाने जीवन जगणारे आणि मेहनती स्वभावाचे आहेत. आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी ते मनापासून जोडलेले असल्यामुळे गावात एक आपुलकीची आणि सांस्कृतिक समृद्धीची भावना अनुभवायला मिळते.या गावातील बहुतांश लोक शेतीत रमलेले असून, अनेकजण शेतकरी किंवा शेतमजूर म्हणून काम करतात. मात्र, गावातील तरुण पिढीने शिक्षणाच्या जोरावर शहरी भागांत नोकरी आणि व्यवसायांतही मोठे यश मिळवले आहे. तरीही, हे सर्वजण आपल्या मातीशी आणि मूळ परंपरांशी घट्ट जोडलेले आहेत. शहरी जीवनाचा अनुभव घेत असतानाही, ते आपल्या शेतीची आणि गावाच्या नैतिक मूल्यांची कदर करतात.येथील लोक ‘साधे जीवन आणि उच्च विचार’ या तत्त्वानुसार चालतात, वागतात व एकमेकांना सहकार्य करत,आनंदात आणि शांततेत जीवन जगत आहेत.

वडाळी नजिकमध्ये लोकांचा, विशेषतः विविध स्वयंसाहाय्य बचत गटांद्वारे महिलांचा, ग्रामविकास तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठा सहभाग दिसून येत आहे. गावात आणि पंचक्रोशीमध्ये द्राक्षे तसेच इतर फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नाशिक शहर आणि मुंबई-आग्रा महामार्ग जवळ असल्यामुळे,वाहतूक खर्च आणि वेळ वाचतो त्यामुळे या प्रदेशात आणि महामार्गालगत शीतगृहे उभारण्यात आली आहेत. उत्तम रस्ते जोडणीमुळे मालाची वाहतूक करणे सोपे झाले आहे. या शीतगृहांमुळे गावात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे, पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गावापासून फक्त २०-२५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने, शेती आणि कृषी उत्पादनांवर अवलंबून असलेले तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. कादवा नदीच्या पाण्यामुळे वर्षभर पाण्याची उपलब्धता असते, ज्यामुळे येथील शेतकरी उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत पिके घेऊ शकतात.

मुख्य व्यवसाय

शेती आणि शेतमजुरी. द्राक्षे, ऊस, कांदे यांची प्रमुख पिके.

रोजगार निर्मिती

शीतगृहे आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे रोजगाराच्या संधी.

महिला सहभाग

स्वयंसाहाय्य बचत गटांद्वारे महिलांचा ग्रामविकासात सक्रिय सहभाग.

सामाजिक एकजूट आणि सण-उत्सव

गावातील लोकांचे सामाजिक जीवन चैतन्यमय आणि सामाजिक एकजुटीने परिपूर्ण आहे. गणेशोत्सव, दिवाळी, होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, मकरसंक्रांती यांसारखे अनेक सण-उत्सव येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. सणांच्या काळात संपूर्ण गाव एक कुटुंब बनून एकत्र येतो. तसेच, कोणत्याही संकटाच्या काळात येथील लोक एकवटून त्याचा सामना करतात. येथील लोकांमध्ये परोपकाराची उदात्त भावना असून, ते कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. यामुळे, वडाळी नजिकमध्ये एक मजबूत आणि प्रेरणादायी समाज निर्माण झाला आहे.

वडाळी नजिकचे लोक आपल्या परंपरा आणि मूल्यांचे अभिमानाने जतन करतात. महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा असलेल्या ‘महाराष्ट्र धर्म’ आणि येथील प्रथा-परंपरांचे ते काटेकोरपणे पालन करतात. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत. त्याचप्रमाणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास यांच्यासारख्या वारकरी संप्रदायातील संतांचा ते अत्यंत आदर करतात. संत जनाबाई, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, आणि संत बहिणाबाई यांसारख्या विविध सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या संतांचेही ते स्मरण करतात. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज (बाबा) आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींचे विचारही त्यांना सतत प्रेरणा देतात.

अध्यात्म, राष्ट्रप्रेम आणि समानता

गावाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनही खूप चैतन्यमय आहे. भगवान शिव मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री खंडेराव महाराज मंदिर, श्री शनी महाराज मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री सप्तशृंगी माता मंदिर यांसारख्या विविध मंदिरांमुळे गावात भक्ती आणि एकतेचे वातावरण आहे. वडाळी नजिक येथे चंपाषष्टीच्या निमित्ताणे आयोजित केली गेलेली श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह हे महत्त्वाचे धार्मिक सोहळे आहेत, जे संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांना मोठ्या संख्येने आकर्षित करतात. हे उत्सव केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून, गावातील लोकांमध्ये सामाजिक ऐक्य आणि सलोखा अधिक दृढ करतात.

वडाळी नजिकच्या लोकांमध्ये राष्ट्रप्रेमही ओतप्रोत भरलेले आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रहिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. भारताचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही राष्ट्रीय सण येथे तितक्याच उत्साहाने, अभिमानाने आणि आनंदाने साजरे केले जातात. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण ते नेहमीच ठेवतात. तसेच, सैनिक, सशस्त्र दल आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या प्रत्येकाचा ते सन्मान करतात. वडाळी नजिकचे लोक प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कामाला समान मानतात. जात, धर्म, पंथ किंवा प्रदेश कोणताही असो, ते प्रत्येक व्यक्तीसोबत समानतेने वागतात,आणि याच गुणांमुळे वडाळी नजिक महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.

दाखले आणि प्रमाणपत्रे
कृपया आपले नाव, संपर्क आणि या दाखल्याबद्दलची तुमची चौकशी लिहा.
दाखले आणि प्रमाणपत्रे
कृपया आपले नाव, संपर्क आणि या दाखल्याबद्दलची तुमची चौकशी लिहा.
कर भरा ग्रामनिधी चौकशी
ग्रामपंचायतीचे कर सहज आणि सुरक्षितपणे ऑनलाइन भरा
कर भरल्यावर, कर भरल्याचा स्क्रीनशॉट खालील WhatsApp वर शेअर करा
कर भरा - पाणीपट्टी चौकशी
ग्रामपंचायतीचे कर सहज आणि सुरक्षितपणे ऑनलाइन भरा
कर भरल्यावर, कर भरल्याचा स्क्रीनशॉट खालील WhatsApp वर शेअर करा
विचारणा / चौकशी करा
कृपया आपले नाव, संपर्क आणि चौकशी लिहा. आम्ही लवकरच उत्तर देऊ.
विचारणा / चौकशी करा
कृपया आपले नाव, संपर्क आणि चौकशी लिहा. आम्ही लवकरच उत्तर देऊ.
मुखपृष्ठ
कर भरा
दाखले
तक्रार नोंदवा